मध्ययुगीन महाराष्ट्र :

मध्ययुगीन महाराष्ट्र :
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात आपणास रामदेवराय यादव यांच्या कालखंडापासून करावी लागते. दिल्लीचा खलजी सुलतान अलाउद्दिन खलजी याने यादवांच्या अफाट संपत्तीविषयी ऐकले होते. ही संपत्ती लुटणे, आपल्या सत्तेची दक्षिणेत ठाणी उभारणे, सत्तेचा विस्तार करणे या कारणांसाठी अलाउद्दिनने महाराष्ट्रातील यादव सत्तेच्या प्रमुख केंद्रावर म्हणजे देवगिरीवर (सध्याचे दौलताबाद) हल्ला केला. राजा रामचंद्र यादव याच्याकडून अलाउद्दिनला फारसा तिखट प्रतिकार झाला नाही. यादवांनी पुढे प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच अलाउद्दिनचा सेनापती मलिक काफूरने यादवांचा वेळोवेळी पराभव केला. रामदेवराव उर्फ राजा रामचंद्रनंतर त्यांचा मुलगा शंकरदेव व जावई हरपालदेव हे यादव सत्तेचे प्रमुख झाले परंतु या दोघांनाही महाराष्ट्राला लागलेले परकीय सत्तेचे ग्रहण संपविता आले नाही. दक्षिणेवर आक्रमण करणारा पहिला सुलतान म्हणून अलाउद्दिनचे नाव इतिहासात अजरामर झाले. संपूर्ण यादव राज्याचा नाश इ. स. १३१८ च्या सुमारास झाला. म्हणजे आजपासून (२००८ पासून) बरोबर ६९० वर्षांपूर्वी हे रामायण घडले. खलजीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने काय प्रतिक्रिया दिली याचे पुरावे इतिहासाला अज्ञात आहेत. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियांची दखल घेण्याइतपत इतिहासलेखनाचा प्रवास प्रगल्भ व्हायचा होता. त्यामुळेच या कालखंडातील इतिहासात सर्वसामान्यांचा आवाज दबला गेला आहे आणि दाबला गेला आहे.

खलजींचे दिल्लीतील राज्य संपुष्टात आल्यानंतर तुघलकांचे राज्य दिल्लीवर सुरू झाले. परंतु त्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खलजींसारखाच होता. तुघलक घराण्यातील महंमद तुघलकाचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. दिल्लीत राहून दक्षिण भारतावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि दिल्लीला परकीय आक्रमकांचा धोका आहे या कारणांमुळे महंमद तुघलक याने दिल्लीतून राजधानी स्थलांतरीत करण्याचा निश्चय केला. ती राजधानी दौलताबादला आणली. या प्रवासात शेकडो लोक ठार झाले. राजधानी - बदलाचा हा प्रयोग महाराष्ट्रात अभिनव होता. महंमद तुघलकाला महाराष्ट्रात- विशेषत: दौलताबादला- आल्यावर जाणवले की, जलद दळणवळणाच्या साधनांच्या अभावी दक्षिण आणि उत्तर भारतावर वर्चस्व ठेवणे अवघड आहे. याच काळात उत्तरेत बंड झाले. महंमदाच्या तख्तला हादरे बसू लागले त्यामुळे दौलताबादची औट घटकेची राजधानी परत दिल्लीला गेली. तुघलक दिल्लीच्या परतीच्या वाटेवर असतानाच दक्षिणेत बंड व्हायला सुरुवात झाली. तुघलकाने दक्षिणेतील असंतोषाचा सामना करण्यासाठी आपले काही सरदार पाठविले परंतु ते अपयशी ठरले. येथील बंडखोर मुसलमान सरदारांनी दिल्लीचा दक्षिणेचा सुभेदार निजामुद्दिन यास महाराष्ट्रात कैद केले. बंडखोर सरदारांचा नेता ‘इस्माईल मख’ याने स्वत:ला ‘नासिरुद्दीनशाह’ पदवी घेतली आणि दौलताबाद येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. येथेच महाराष्ट्रातील स्थानिक व एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या पुनरुज्जीवनाची शक्यता संपुष्टात आली. दक्षिणेतील संभाव्य धोका ओळखून तुघलक स्वत:च मोठे सैन्य घेऊन दौलताबादच्या दिशेने येऊ लागला. ही बातमी समजताच इस्माईल मख उर्फ नसिरुद्दीनशाह राज्य सोडून पळून गेला. या घडामोडी घडत असतानाच गुजरातमध्ये बंड झाले म्हणून तुघलकला तिकडे जावे लागले. त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांकडे दक्षिणेतील मोहिमेची सूत्रे दिली. परंतु ‘नासिरुद्दीनशाह’ च्या बंडखोर सैन्याने तुघलकच्या सैन्याचा पराभव केला.

त्यामुळे महाराष्ट्रात ‘नासिरुद्दीनशाह’ चा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. तो वयोवृद्ध झाल्याने त्याने आपला सहकारी ‘अलाउद्दीन हसन’ याच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. ही घटना दिनांक ३ ऑगस्ट,१३४७ रोजी घडली. या अलाउद्दीन हसनचे पूर्ण नाव अलाउद्दीन हसन गंगू बहमनी होते. त्याने व त्याच्या मुलाने पाडलेल्या नाण्यांवर बहमनशाह अशी उपाधी लावून घेतली आहे. यावरून त्यांच्या घराण्याला ‘बहमनी’ नाव पडले. इ. स. १३४७ ते १५३८ अशी १९० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द या घराण्याला मिळाली. एकंदर १८ राजे या घराण्यात झाले. या १८ राजांपैकी आठ कर्तबगार निघाले, तिघांचा खून झाला, दोघांना आंधळे करण्यात आले. एक अल्पायुषी ठरला तर शेवटचे चार नामधारी राजे झाले. सोळाव्या शतकाच्या पहिल्या १-२ दशकातच बहमनी राज्याची पाच शकले झाली. यातून बीदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वर्‍हाडमध्ये एलिचपूर येथे इमादशाही, गोवळकोंडा येथे कुत्बशाही (किंवा कुतुबशाही) अशा पाच शाही निर्माण झाल्या.

अलाउद्दीन हसनचा समकालीन राजा अलीखान फारुकी याने खानदेशातील थाळनेर येथे फारुकी वंशाचे राज्य स्थापन केले. बागलाण प्रदेशात राठोडांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा रीतीने महाराष्ट्राची विभागणी या सत्तांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात केली. यातील इमादशाहीचा शेवट सम्राट अकबराने २० वर्षांच्या आत घडवून आणला. अकबरानेच फारुकी सल्तनतला शेवटच्या घटका मोजायला लावल्या. पुढे बरीदशाही संपली. निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही मुघलांनी संपुष्टात आणल्या. २०० वर्षांपेक्षा जास्त एकही सत्ता टिकली नाही. या  शाहींनी स्वत:च्या सत्तेचे वर्चस्व टिकवून धरण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन बहुजन समाजाला हाताशी धरले. बहुविध जातींमधील लोक पुढे यायला लागले. स्वकर्तृत्वावर ते पुढे जाऊ लागले. येथील सुलतानांना याशिवाय पर्याय नव्हता. यातूनच स्वराज्याची पार्श्र्वभूमी तयार झाली. हे सगळे होत असताना राज्यकर्त्यांच्या धर्माचा प्रभाव, संस्कृतीचा प्रभाव येथील लोकजीवनावर पडला. जीवनाचे एकही क्षेत्र असे नव्हते की, जेथे राज्यकर्त्यांचा प्रभाव नव्हता. या सगळ्याला छेद देऊन ‘महाराष्ट्र धर्म’ जागविण्याचे प्रयत्न केले ते महाराष्ट्रीय संतांनी!

संतांची कामगिरी -
‘मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या  ग्रंथात न्या. महादेव गोविंद रानडे यांनी संतांच्या भूमिकेविषयी पुढील भाष्य केले आहे. ‘‘जातीजातीतील विषमता कमी करून संतांनी महाराष्ट्राची भूमी ऐक्यभावनेने नांगरून तयार केली. त्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यात स्वातंत्र्याचे बी पेरणे शक्य झाले.’’ खरं म्हणजे महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता व देशी भाषेतील विचारधन यांची निर्मिती संतांनी प्रवर्तित केलेल्या भक्तिपंथाकडूनच झाली असल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठी संत हेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रमुख शिल्पकार ठरतात. धर्माचे रहस्य समजावून देऊन संतांनी उच्च व उदात्त विचार, कृती यांवर भर दिला. महाराष्ट्रात संत परंपरेचा उदय तेराव्या शतकात झाला. या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात लोकभाषांमधून भक्तिमार्गाचा प्रसार करणारे भागवतधर्मीय संत पुढे आले. परमेश्र्वरप्राप्तीसाठी उत्कट भक्तीखेरीज दुसर्‍या कशाचीच जरुरी नाही, त्यामुळे कुलजातिवर्णादी विषमतेला, स्त्री-पुरुष भेदाला किंवा विद्या, धन, प्रतिष्ठा इत्यादींमुळे प्राप्त होणार्‍या अधिकारभेदाला भागवतधर्मात बिलकुल थारा नाही, असे प्रतिपादन संतांनी केले. नाथपंथ, महानुभाव, वारकरी पंथ यांनी महाराष्ट्राला जागे केले. संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत रोहिदास व कनकदास, कान्होपात्रा, जनाबाई, चोखामेळा आदी संतांनी महाराष्ट्रात लोकजागृती केली.
0 Responses